कट्टा - तानसेन

26 February 2012 वेळ: Sunday, February 26, 2012

मुंबईत जसे सगळे मित्र नाक्यावर भेटतात, तसं पुण्यात कट्ट्यावर. एकंदर माहोल तुमच्या लक्षात आलाच असेल. इकडे सगळ्यांची एक खास ओळख असते. संध्याकाळची सहा ते दहा ह्या वेळी एखाद्या हॉस्टेलवर राहणाऱ्यासाठी आयुष्यातली अत्यंत भकास वेळ. मग तिला थोडं रंगीन करायला सगळे कुठेतरी एकत्र जमून "ignorance is bliss" मधे वेळ काटून नेणार. दररोज संध्याकाळी प्रत्येकाचा नवीन विषय असतो. कोणाची लफडी, कोणाचा वचपा, कोणाच्या फोका....आमच्या कट्ट्यावर पण असे बहाद्दर असणारच. (आता सगळे मार्गी लागलेत.)

सुरवात तानसेन पासून करावी म्हणतो. आमचा तानसेन हा कट्ट्यावरचा राज-गायक होता. (ह्याचा अर्थ असा नाही की तो सगळ्यांपेक्षा चांगलं गायचा.) कही वर्षांपूर्वी विजय मल्ल्याला competition द्यायला मीच एक आमची कंपनी काढली होती. आमच्या कंपनीचं पण नाव "यु.बी" होतं. फरक इतकाच की इथे यु.बी चा अर्थ "उदास बंधू" असा होत. तानसेन आमच्या कंपनीचा "brand ambassador" होता. त्या मागे कारणही तितकंच तगडं होतं. त्याला नेहमी होलसेल मधे टेंशन असायचं. पैसे, धंदा, गायन, घर हे सगळे टेंशन हह्याला स्वस्तात मिळायचे. इतक्या टेन्शन्स पोसणाऱ्याला मग गाणे पण दुखी सुचायचे.

तसं पाहता तानसेन जिद्दी होता. शहरात आलेल्या प्रत्येक audition मधे हजेरी लावायचा. ३-४ round पार करायचा अन् मग सायेब अडकायचे. अगदी पिंपरी-चिंचवड आयडॉल मधे पण आजकाल वशिलेबाजी चालते. तिकडे तर आमचा दोस्त उपांत्य फेरीत जाऊन आला. पण हा साला कधी खच्ची नाही झाला. त्याच्याकडे एक डायरी असायची, त्यात तो आवडलेले गाणे-कविता लिहून ठेवत. कुठे जरा मोकळी हवा आणि परिसर दिसला की तानसेन रियाज करे. "मैने तेरे लिये ही जग छोडा, तू मुझको छोड चली....." ह्यात बीट सुटला म्हणून काय झालं, ह्याचा सूर मात्र जाम उंच लागायचा. दिल चाहता है - मधलं तन्हाई गाणं तर तो जे रंगवून गायचा, एकदम दिल खुष व्हायचं. पण आमच्या तानसेनचा ज्यूक-बॉक्स थोडा लिमिटेड होता. मग आपलं रोज cassette ची आधी A-side वाजायची, अन् मग B-side.

एकदा आम्ही सगळे निलकंठेश्वरला जायचं ठरवलं. पावसाळी हवा होती, त्यात तानसेन ची यारी. थोडं वर गेलो नाहीतर तानसेनला गाणं गायचा मूड आला. आम्ही सगळे आजू-बाजूच्या दगडांवर टेकलो. तानसेन मात्र उभा राहून perform करत होता. आता एका पाठोपाठ ४ गाणे आले होते. आम्हाला वर पोह्चायची घाई लागली होती, पण रियाजमधे टांग अडवणार कोण? तोच खाली शेतातून एक हाक आली..."ओ, बास करा आता!" तानसेनचा लगेच pack-up झाला. हा खरं तर अपमान होता आमच्या तानसेनचा, पण सध्या तो आमच्या पथ्यी पडला होता.

मग एक दिवस  चर्चा खूप रंगली, आजकाल गाण्यांच्या चालीला महत्व आहे की बोल? त्या वेळी हिमेश रेशमियाचे गाणे मोकाट सुटलेले. सगळ्यांचे म्हणणे पडले, की आजकाल गाण्यांमध्ये बोल नसले, अन् रापचिक चाल असली तरी गाणे चालतील. विषय खूप टोका पर्यंत गेला. तानसेनने २-४ दिवसात लगेच एक स्वतःचं गाणं पेश केलं मग!

"पैसा तेरी जेब में कम है तो क्या हुआ?
लेले मेरी जान तू एक.... वडा-पाव" 

त्याला एकदम बँजो स्टायल संगीत पण वाजवलं आम्ही. गाणं लगेच डोक्यात बसलं. तानसेनही खुष!
सुरवातीला खूप उत्साह दाखवला, पण सालं नंतर सगळं ढेपाळलं. आता तानसेन आपली नौकरी करतो, घरच्यांनी लग्न लावून दिलं. गेल्या वर्षी एक मुलगा पण झाला. अजून देखील तानसेनचा अधून मधून फोन येतो. सगळ्यांची आठवण काढतो. गाण्याची आठवण मात्र दोघांपैकी कोणीच काढत नाही. 

मोकळे "आकाश"

25 February 2012 वेळ: Saturday, February 25, 2012
आज मी इथं उभी आहे .. ह्या बुडणाऱ्या सूर्याच्या संगतीन समुद्राच पाणी असं पायावर अनुभवतं...
आकाशी रंग असा हळू हळू लाल मग गडद होईपर्यंत आपण बसलोय इथं .. किती वेळ .. बरेच तास .. काळ गोठलाय जणू ....
आपणही आज आपल्या आवडीचा नितळ आकाशी रंग घातलाय ...
आपलं नेमक उलट झालय नाही का ?....
गडद ,चमचमणाऱ्या रंगातून उठून आपण असे मनासारखे शांत, हलके रंग लेवून बसलोय ...
मागल्या वर्षापर्यंत असलं काही स्वप्नातही पाहायचही आपली हिम्मत नव्हती ...
काय करत होतो आपण ह्यावेळी...... मागच्या वर्षी ..

मागच्या वर्षी पर्यंत मन आणि शरीर एका जागी ठेवायच्या गोष्टी नव्हत्या ...मन खुंटीवर ठेवून काम करायचो आपण ..धंदा करायचो आपण........ तेव्हा हळुवार ,नाजूक काही अस्तित्वात असतं हेच माहिती नव्हंत.. आपली मावशी इतर माड्यानवरल्या मावशांपेक्षा बरी हा एकमेव सुखाचा धागा होता आपल्यासाठी ..बाकी रोजच्या रोज ओरबाडण सहन करत होतो आपण ...

साला तिथं झोपडपट्टीत कसलं गटारात जन्माला आलो .. बाप टाकून गेला आई खंगून मेली.. मामानं इथं आणून विकल आपल्याला.. सहा का काय ते वर्षाच असताना ...आपल्याला थोडफार वाचता येतं म्हणून मावशीने भडव्याला चार पैसे जास्तच दिले..... आणि मग पुढे ह्या धंद्यात घुसडलो गेलो.. आधी बिचकत,घाबरत मग निर्ढावत गेंड्याच्या कातडीने रोजचा खेळ मांडत राहिलो ... आपल्या नशिबात सगळे गिर्हाईक पण गांडूच आले...चांगला प्रेमळ गिर्हाईक हे असलं काही सीनेमातच होत असावं असं म्हणत,कण्हत दिवस काढत राहिलो ... शरीराच लोढण पोटासाठी ओढत राहिलो ..
आणि आयुष्य पलटी खावून असं आपल्या मर्जीने जगू शकू असं कधीच वाटलं नव्हतं... त्या बाईंनी येवून आपल्याला बाहेर काढलं दलदलीतून.. काहीजणींना तरी ह्यातून बाहेर पडू देत म्हणून मावशीला खूप समजावलं . इतर मावाश्यांसारखी आपली जनीआक्का हटून नाही राहिली .. तिनं पोरींवर सोपवला निर्णय .. हा... पण म्हणाली गेलात तर ह्या वस्तीच्या आसपास पुन्हा येत येणार नाही तुम्हाला .. मग मी मेले समजायचं ..

शे पाचशे जणींतून आंपण आणि सरू ,दोघीच बाहेर पडलो बाईंसोबत... आणि शिकत सावरत आता इथे येवून मानान चार पैशे कमावतोय ....
किती वेळ झाला बसलोय नाही .. किती गर्दी कोणी कोणाला ओळखत नाही कोणी कोणाला टोकत नाही ..
अरे हा तोच पोरगा का ... पाहिलं त्यांनपण मला...... ओळखलं वाटत ..
"पूनम इथे कशी ..." त्यानं सवाल टाकलाच
"........................."
"ओळखल नाहीस मला पुण्यात यायचो मित्रांबरोबर तुमच्या इलाक्यात गप्पा मारायला" तो
"अरे तो होय तू .. तरीच म्हणत होते तुला कुठतरी पाहिलंय म्हणून ..." उगाच खोट
"तू एकटीच जिनं नाव सांगितलं होत आम्हाला म्हणून लक्षात राहिलीस बघ , पण इकडे एवढ्या लांब कशी.. आणि किती वेगळी दिसतेयस तू ...." त्याच्या चेहर्यावरच आश्चर्य मला स्पष्ट दिसतंय, कळतंय
"धंदा सुटला माझा ..आता एका स्टोरमध्ये काम करते मी ...." आणि मग त्याला सगळी हकीकत सांगितली... चेहरा उजळत गेला त्याचा ...
एकदम तसाच आहे हा आधीसारखा ..
"काय सांगतेस काय ..मस्तच ग .. खर सांगू पहिल्यांदा तुला आज असं एवढ खुश पाहतोय मी ..."

किती मनापासून बोलतोय हा .. तेव्हाही असाच बोलायचा नाही का .. आणि आपल्याविषयी वाटणारी काळजी,दुखः ह्याच्या चेहऱ्यावर उमटायचं .. आपल्याला ह्याच्या गोर्या, बोलक्या चेहऱ्याच, पाणीदार डोळ्याचं कौतुक वाटायचं .. खूप काही बोलायचं आहे पण हा थोपवून धरतोय असं वाटायचं .. पुरुषाशी गप्पा हा चैनीचा विषय होता आणि मावशी बारीक डोळा करून पाहत रहायची म्हणून काहीच करू शकायचो नाही .. ह्याच अस्वस्थपणं जाणवतं राहायचं ....
आणि आता मनापासून हसत उभा आहे आपल्यासमोर ..जसं काही मोठ गवसलय ह्याला ... आणि अचानक हनुवटी पकडून चेहरा हलवलाय आपला ... किती निरागस,प्रेमळ स्पर्श हा ... एवढ्या वर्षातून पहिल्यांदा अनुभवत आहोत असा स्पर्श ...

तेव्हाही वाटायचं नाही का आपल्याला कोणीतरी हलकेच आपली पाठ थोपटावी, हात पकडून धीर द्यावा .. आणि तेव्हाही ह्याचाच चेहेरा यायचा डोळ्यासमोर .. आपल्यासारख्या बाईकडूनही 'तसली' अपेक्षा न करणारा .. डोळ्यातून धीर देणारा ..
आणि आता अनपेक्षितपणे उभा आहे आपल्यासमोर आपल्या सुखाच्या क्षणी आपण वर्षानुवर्ष वाट पाहिलेला.. स्पर्श देत ...

तेव्हा वाटायचं ह्यालाही आपल्याला असा धीर द्यायचा आहे ... पण त्याला कसलीशी भीती वाटत असावी ..मी काय विचार करेन ह्याचा कदाचित .. मला हे उमजूनही सांगता नाही आल तेव्हा तुला कि, माणसा एवढी वर्ष असले किळसवाणे,ओंगळवाणे स्पर्श अनुभवते आहे मी .. तुझ्या स्पर्शाचा चुकीचा अर्थ मी स्वप्नातही काढू शकले नसते .. पण तू इतका निरागस की मला स्पर्शाचं वाईट वाटू नये म्हणून दूर राहिलास ..मला धीर देता नाही येत म्हंणून स्वतःशी झुंजत राहिलास ...मला तुझी तगमग कळली नाही अस नाही पण माझ्या हातात काहीही नव्हत

आणि इथे तू असा मला धीर देतो आहेस ....

अचानक तुझा चेहरा बदललाय... कसलच अपराधीपण उमटलय तुझ्या ह्या बोलक्या चेहऱ्यावर... मला स्पर्श केलेल्या हाताकडे तू विचित्रपणे पाहत आहेस ..
मी न राहवून विच्रातेय.. "काय झाल रे ........"
तू उत्तर देवू नको देवूच्या द्विधा मनस्तिथीत .." काही नाही "
" बोल रे आज तरी बोल " मी पटकन बोलून गेलेय आणि तू चमकून वर पाहिलयस ..मला तू दडपलेले अनेक शब्द दिसत आहेत हे जाणवून तू चमकला आहेस ...
"खूप बोलावं वाटायचं तेव्हा ...पण नाही जमल .. आणि आज इथे तूला असं हात लावताना अपराधी वाटतंय .. मी भेदभाव केला असं वाटतंय...."
"तसाच हळवा आहेस तू अजून.. तेव्हा नाहीस केलास स्पर्श हे बरचं केलसं तू .. "
"................"
"असला जिव्हाळ्याचा स्पर्श तेव्हा केला असतास तर फक्त अजून दुखं झाल असतं ..कारण काही गोष्टी अनुभवल्या नसल्या की त्या मिळाल्या नाहीत तर आपण कशाला मुकलो आहोत हे माहित नसतं ... कोणीतरी धीराचा स्पर्श करावा असं नेहमी वाटायचं पण त्यात एवढी जादू आहे हे माहित नव्हंतं... आता जाणवतंय तू दूर राहिलास हे चांगलच केलस ... नाहीतर ती नरक यातना अजूनच असह्य झाली असती..

आता तुझा स्पर्श मला धीर देतोय पण दुखः नाही.... वाईट वाटून घेवू नकोस ... शरीरापेक्षा मनाचे हाल किती वाईट हे माझ्यापेक्षा अजून कोण चांगल सांगू शकेल ... मनाला नसत्या शिक्षा देवू नकोस .. तूला माहित नाही तू किती धीर देवू शकतोस,आणि मला भेटलास माझ्या दोन्ही आयुष्यात हे खरच सुखकारी आहे ..हा क्षण दिलास मला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद ..पण आता जाते.. तू मला दिलेला हा आनंदाचा क्षण तू काहीतरी बोलून हिरावून घेशील की काय ह्याची भीती वाटतेय ..म्हणून मी जाते.. काळजी घे ..."

त्याच्या त्या निरागस,पाणी भरल्या डोळ्याकडे पाहत मी निघालेय ... काळोखी वाळू तुडवत ....एक सोनेरी क्षण घेवून .. जगण्यासाठी..................... मी निघालेय .......

- मातुमैनी.

मच्छी बाजार

12 February 2012 वेळ: Sunday, February 12, 2012



एक संध्याकाळ. वर्सोवा कोळीवाड्याच्या कडेला नुकत्याच बोटीतून ताजे मासे भरून आलेत.

फोटो निकालने आए थे, हलवा लेकर जा रहे हैं|




 
 

शलौम शाब - ११

10 February 2012 वेळ: Friday, February 10, 2012
आता पर्यंत:
भाग  १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
भाग  ६ | भाग ७ | भाग ८ | भाग ९ | भाग १०

 

तृशिली नदी, हिमालय आता लांब मागे सुटले होते. वेळ हा कधीच पुरा नाही पडत. काही गोष्टी सूक्ष्म असतात म्हणून दिसत नाहीत, अन् काही प्रचंड मोठ्या असतात म्हणून दिसत नाहीत. भेटलेल्या लोकांचे स्वभाव तर कमाल होते. एका परक्या देशात, ओळख ना पाळख तरी आपल्यातला म्हणून घेणारे भेटले की कसलं भारी वाटतं. (वरून तुम्ही ह्या पोस्ट अशुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करत वाचलंत....) सगळेच अनुभव इथे मोजत बसणे रटाळ वाटेल. बरेच अनुभव स्वतःपुरताच असलेले बरे असतात, योग्य वेळी ते प्रत्येकाच्या पुढ्यात येऊन पडतात. वेळेचं महत्व म्हणतात ते हे असावं. ना की तीन तासात १०० मार्कांचा पेपर सोडवणे. आयुष्यात काही गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे म्हणून दहावी - बारावीमधे योग्य वेळात पास व्हावं, पण खरंच किती मुलांना इतिहास, गणित, विज्ञान, नागरिक शास्त्रचा मनापासून आभ्यास करावसा वाटतो? (माझ्या मराठी मधे डझनभर चुका आहेत, मी पण शेवटी पास होण्यासाठी केलेला तो आभ्यास.) वेळेच्या महत्वा पोटी जर सगळे गग्या बनू लागले, तर  Human Evolution मधे ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. हजारो वर्षांनी जर माणसाचे परत माकड झाले तर? Evolution Cycle complete होईल! इकडे हिमालय बघितल्यापासून नझारीयाच बदलून गेलाय.

कधी वेळ  काढावा लागतो, तर कधी वाचवावा लागतो. विज्ञानाच्या मदतीने आता हे सोप्पं होतांना दिसतंय, इतकं सगळं करून पण अनुभव हा वेळेच्या डबीत बसवता आला नाही. अनुभवाने कसलेल्या हातून होणारे ते काम, कला म्हणून ओळखल्या गेलं पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कलाकार असतोच.


सकाळी उठल्या बरोबर बर्फाने झाकलेला हिमालय आता दिसत नसला, तरी हरकत नाही. तो इथेच असेल हे निश्चित. पुन्हा एकदा जनरलच्या डब्यात, वर तापलेला सूर्य. गाडीची सावली पण गाडी बरोबर पळतेय. दिवस सरकतो तसं गाडीच्या नवीन सावल्या दिसतात. मग एक धासू वाक्य जुळलं - "माणसाची पारख त्याच्याकडे बघून नाही, तर त्याच्या सावली कडे बघून करावी. तो उजेडाच्या कुठल्या दिशेला उभा आहे ओळखणं सोपं जातं." वाह मग स्वतःवर खुष होऊन आळस देत जनरल डब्याच्या सह-प्रवाश्यांच्या गप्पांमध्ये रंगलो.

आता परवाची गोष्ट, मित्रांबरोबर चायनीज खायला गेलो होतो. तिथल्या नेपाळी वेटरला "दाई" म्हणून हाक मारली. त्याने एकदम हसून बघितलं. कदाचीत त्याला कोणी त्याच्या भाषेत "दादा" म्हणणारा आज भेटेल वाटलं नसेल.

तुम्ही  कधी निघताय मग?
The only rules that really matter are these: what a man can do and what a man can't do.







शलौम शाब - १०

02 February 2012 वेळ: Thursday, February 02, 2012
काठमांडू आणि पाटण मधून बागमती नदी वाहते. पाटण देखील भारतापुरसारखेच एक इतिहासिक मोल असलेली जागा. सकाळची एक पटकन चक्कर मारून परत फिरलो. मामाचे एक मित्र काठमांडूत असतात. त्यांची पण भेट घ्यावी, म्हणून त्यांना फोन केला. सकाळ संध्याकाळचे जेवण त्यांच्या बरोबर घेण्याचा आग्रह केला. संध्याकाळी तारांकित हॉटेल मधे जेवण, तर सकाळी  नाश्त्यासाठी गुरवार असून सुद्धा माझ्या करता ऑम्लेट. त्यांना एकच हळहळ होती, "आधी फोन का नाही केला. आता सगळं बघून झाल्यावर भेटलास आम्हाला." राजभंडारी परिवार सोबत गप्पा आणि जेवणाचे वेग-वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन नेपाळ होऊन परतायचे विचार येऊ लागले.

कुठे तरी दिलेल्या वेळेत पोहचण्यात ती मजा नाही, जी मनात येईल तेंव्हा प्रवास करण्यात आहे. नवीन लोक, स्वभावांची ओळख वाढवत. कदाचीत ही लोक मला पुन्हा कधी भेटणार देखील नाही, पण कुठेतरी ह्यांच्या स्वभावाची/विचारांची नोंद घेतल्या गेली होती. कधी एखाद्या बाबतीत आत्मविश्वास असल्यास, आपण त्याची चिंता करत नाही. ती गोष्ट नेमकी कशी होणार, हे आतून बाहेरून माहिती असतं. तिच्यात ना आपण सौंदर्य बघतो, न तिच्यातल्या खुबी बघून भारावून जातो. म्हणूनच मी इथले रस्ते फिरतांना त्यांच्या प्रेमात पडायचो. हेच ते रस्ते होते, जे मला माझ्या मनात येईल त्या ठिकाणी पोहचवत. त्यांनी मला कधी कमीपण नाही दिला. तुम्ही कधी अश्या माणसाला भेटला आहात का, जो शुक्रवार पेठेचे कौतुक करतोये. स्वारगेट बस स्थानकाचे भव्य रूपाचे वर्णन करतो आहे. एकदा काय सगळं घिसा-पिटा वाटू लागलं की मग नवीन जागेचा शोध घ्यावा. कोण जाणे तिथले माणसं आणि त्यांचे राहणीमान बघून आपल्याला स्वतःमधे काही नवीन बदल घडवण्याची प्रेरणा मिळेल. नुसता प्रवास करून, तिथले पर्यटन स्थळे पाहून फिरून येण्यात काय ठेवलंय? अश्या फिरण्यात जर तुम्ही तिथली गर्दी आणि मुंबईच्या लोकल मधल्या गर्दीची तुलना करत राहिलात, तर तुम्ही किती वेळ फिरलात?


अजून आपण एवोल्युशनच्या एका transit stage मधे आहोत. माणूस स्थायिक झाला हे निश्चित, पण ह्यात त्याची mobility hamper झाली आहे. माणसाने आता फक्त कामा पुरताच फिरावे? स्वतःच्या भौतिक previlages चे गुलाम बनून राहावे? Needs आणि previlages मधे फरक आहे. नेमकं साला रोटी कपडा आणि मकान मधे आय-फोन घुसला आणि आम्ही सगळे चक्रावून गेलो! ह्यातून बाहेर पडायचा रस्ता आपण सर्व आप-आपल्या परीने शोधू पाहतो आहोत. 

आयुष्य म्हणजे नुसतेच गाठीशी चार पैसे जमवणे. आपल्या अडचणीच्या वेळी खर्च करायचे हे नक्कीच नसावे. ह्या पेक्षा मोठा हेतू क्वचितच कुठे दिसतो. शेवटी सगळ्यांचा एकच शोध चालू आहे, आनंद प्राप्तीचा.

उद्या इथून गोरखपूर गाठायचे.
तिथून पुढे कुठे जायचे ते मला ठाऊक नाही.




  

शलौम शाब - ९

वेळ: Thursday, February 02, 2012
थल्या थंडीची सवय पडली होती. तापमान ४ डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन आलं, तरी ही थंडी बोचरी वाटत नाही. इथे इतक्या दूर बसून सगळं काही ओळखीचं वाटू लागलं आहे. प्रत्येक जागेची एक खुबी असते. एकदा काय तुम्ही नव्या ठिकाणी आलात, की इथली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नवीन. कुठलीही वस्तू पहिल्यांदा बघतांना मजाच वाटते. नजर इकडे तिकडे पडत असते, येईल त्या बऱ्या-वाईट अनुभवाची परवा न करता ते सगळे गाठीशी ठेवतो. काही दिवसांनी मी पुन्हा मुंबईत असीन, तिकडे अगदी सराईत मुंबईकर असल्या सारखा फिरीन. इराण्याच्या दुकानातल्या त्या सुंदर जुन्या खुर्च्याचं नवल नसेल मला, ना स्टेशनवर तुंबलेल्या गर्दीची भीती. आज काठमांडू पण मला ओळखीचे वाटू लागलंय. ह्या शहराची जादू आता माझ्यावरून उतरते आहे. आपण कितीही दूर गेलो तरी आपल्या विचारांची आणि स्वभावाची वाही नेहमी आपल्या सोबत असते. हेच विचार आणि हाच स्वभाव आपल्याला तिथे पण दिसून येतो. का नाही मग सगळं ओळखीचं वाटणार? मग ह्या वहीचे नवीन पान उघडणे नवीन विचारांची नोंद करून बघितले पाहिजे.

आज एखादा नेपाळी सिनेमा बघावा म्हंटलं, पण इथे नेपाळी सिनेमा पेक्षा शाहरुखच्या रा-वन ची चलती होती. विषय मिटवून भारतापुर शहर बघायला निघालो. इथून एक तासाचं अंतर आहे. ह्या शहराला खूप इतिहास आहे. वास्तुकला बघण्यासारखी आहे. इथले रस्ते बघून मला शाळेत एका धड्यातल्या चित्रातले stone cobbled road आठवले. सकाळची कामं उरकून बायका स्वेटर विणत होत्या, काही धान्य निवडत. पुरुष मात्र कॅरम खेळण्यात रमले होते. एका ठिकाणी थांका पेन्टिंग स्कूल होती. काही लहान मुलं एका घोळक्यात त्यांच्या मास्तरांचे निरीक्षण करत होते. काही मोठी मंडळी मात्र स्वतः होऊन चित्र घडवत होते. त्यात एक सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव असलेला विद्यार्थी एक अत्यंत कोरीव थांका रंगवत होता. तो इतरांसारखे कागदावर रंगवत न्हवता. ह्या चित्रांमध्ये symmetry खूप ठिकाणी दिसून येत होती.  तिथल्या एका मास्तरने मला माहिती सांगितली. ह्या चित्रांचा वापर गौतम बुद्धांची शिकवण येत्या पिढी-दार पिढीला शिकवण्यासाठी केल्या जातो. जसे आपल्या शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या बाई periodic table चा हे मोठा चार्ट घेऊन येत, तसं असावं हे. शिकवणीचे चित्रिकरण करण्याची हे सगळ्यात सुलभ आणि सरल पद्धत. हे सुती कापडावर अथवा सिल्कवर रंगवल्या जातं. ह्यात वापरलेले रंग पाल्या पासून किंवा रंगीत दगडांची भुकटी करून त्यात गोंद मिसळून बनवल्या जातात. इथे एक मुलगा सोन्याच्या छोट्याशा तुकड्याला उगाळून बनवलेल्या सोनेरी रंगाने त्याच्या चित्र रंगवत होता. आज ह्या चित्रांना commercial scale वर पण मागणी आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी ६ ते ७ वर्ष ह्या मुलं नेमाने येऊन इथे शिकतात. तुम्हाला जर काही थांका चित्र बघायची असतील तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयला जरूर भेट द्या.



दरबार चौकात पर्यटकांची प्रचंड गर्दी लोटली होती. तिथल्याच एका छोट्याशा घर वजा उपहारगृहात जेवण मागवलं. हे एक तिबेटी उपहारगृह होतं. फ्राईड मोमो मागवले. समोर पाटी "टोंगबा - हॉट बिअर" ची पाटी वाचली. ठरलं तर मग, हॉट बियर हा काय प्रकार आहे तपासून बघायचा. थोड्यावेळात माझ्यासमोर एका मोठ्या अल्युमिनियमच्या पेल्यात अल्युमिनियमचा straw टाकला होता. वरून झाकणी. त्याने एक मोठा थर्मास भरून गरम पाणी आणले. पेल्याची झाकणी उघडली, त्यात आंबवलेली नाचणी होती. त्यात गरम पाणी ओतलं. अल्युमिनियमची नळी खालून चपटी केली होती, त्या मुळे नाचणी वर येत नसे. चवीला तुरट अशी टोंगबा  त्या उपहारगृहाच्या मालकाला कडून मग हिला बनवण्याची पद्धत माहिती करून घेतली. आधी नाचणी आणि "मार्छा" (हा काय प्रकार असतो मला माहिती नाही, पण हा तितकाच जरुरी घटक आहे.) आधी शिजवून एका भांड्यात हवा बंद करून ठेवल्या जाते. ६ महिने आंबवलेल्या ह्या नाचणी मधे गरम पाणी मिळवून टोंगबा पेश केली जाते. टोंगबा मधे ६-७ % अल्कोहोल असते. एकदा चवीची सवय पडली, की रुचकर लागते. राक्षी बनवण्याची पण पद्धत सारखीच आहे, फक्त राक्षी बनवतांना तांदूळ देखील वापरता येतात. तांदळाची राक्षी एक महिन्यात आंबते, नाचणीची सहा महिन्यात. थर्मास मधे ५-६ वेळा ग्लास भरता येईल इतके पाणी होतं. इथल्या थंडी करता ही बियर खरंच एक उत्तम पेय आहे. सोबत फ्राईड मोमो होतेच. बढिया वाफाळलेल्या मोमो बरोबर टोंगबाने मजा आणली.


इकडे तिकडे फिरून भटकून आलो. मला इथून लगेच निघायची इच्छा न्हवती. एका ठिकाणी एक toy-maker दिसला. तो काही घोडे बनवत होता. मी सहज त्याला विचारलं, की मी त्याला मदत करू शकतो का म्हणून. त्याने सगळ्यात सोप्पं काम मला दिलं, खिळे ठोकून सगळे तुकडे एकत्र जोडायचे. बसल्या बसल्या सगळ्या घोड्यांचे अव्यय जोडून झाले. घोड्यांची फौज उभी झाली होती. गप्पा मारता मारता सगळे घोडे उभे झाले. घराच्या व्हरांड्यात बसून खेळणी बनवणाऱ्या ह्या toy-maker चा आणि त्याच्या बायकोचा फोटो काढून तिथून निघालो.


परत येतांना सहज मनात विचार आला, ह्या सर्व ठिकाणी हिंडून फिरून अनुभव घेतांना मला स्वतःला अनेक तडजोडी करायला लागायच्या. इथल्या प्रत्येक अनुभवाचा आस्वाद घेण्याकरता आधी आजू-बाजूच्या परिसरात मिसळून जाणे महत्वाचे वाटते. पण कदाचीत असं तर नाही, की ह्या adjusting स्वभावामुळे मी आपला स्वतः भोवती स्वतःच्या कम्फर्ट झोन बनवून त्यातच संपूर्ण नेपाळ बघ्तोये. हे काहीतरी वेगळं होतं. असं तर नाही म्हणून आज सकाळ पासून मला ह्या इलाक्याच्या अनोळखीपणा ओसरून गेल्या सारखा वाटत होता. कदाचीत हे एका विशष्ट साचेबद्ध विचारसरणी मुळे असावे. खरंतर विचारांच्या तारेला वाटेल तो आकार देता येऊ शकतो, नाही का? आपलं उगाच हिच ती पूर्व दिशा समजून आपण आपल्याच वर्तुळातल्या पूर्व दिशे कडून सूर्य उगवायची वाट बघतोये असं वाटतं.









 

 



AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates