शलौम शाब - ६

24 December 2011 वेळ: Saturday, December 24, 2011
अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करून आल्यावर सगळ्यात पहिले जे केलं असेल, ते म्हणजे अगदी गरमा-गरम जेवण. जर्मन बेकरी मध्ये निवांत बसून छान organic कॉफी आणि रोलीचा आस्वाद घेत दिवस आखला. मला इथे अगदी निवांत मासे पकडायचे आहेत, सायकल घेऊन आस पासचा परिसर फिरायचा आहे. एक एक इच्छा मनात येईल तशी पूर्ण होत गेली. संध्याकाळी मानसिंगला फोन लावला, तो तिथे जवळपास होता. लगेच भेटायला आला. त्याला आदल्या आठवड्यातल्या ऑफर बद्दल आठवण करून दिली. तो एक क्षणासाठी विचारात पडला, त्या वरून मी पण एक अनुमान बांधला. नेमकं तो हा आठवडा कामाने गुरफटला होता म्हणून कळाले. मी पण आठवडाभर राहण्याचा बेत आता दोन दिवसांवर आणला. मानसिंगची पण सोय शेवटी महत्वाची. शेतात तसं काही खास काम न्हवते, थोडी बहुत कामं केली की मग गावातल्या आसपासच्या पोरांना गप्पा मरता मरता इंग्रजी शिकवायची.

इथे मानसिंगने मला रॉक्सी (राक्षी)ची ओळख करून दिली. राक्षी ही इथली लोकल दारू. नाचणी पासून बनवल्या जाते. खूप जास्ती ढोसायची नसते. छोट्याशा ग्लास मध्ये साधारण ६० मिली. एका घोटात घेऊन, बाटली कपाटात ठेवणे. राक्षीची शुध्त्ता तपासण्यासाठी राक्षित बोट बुडवून मग बोट अग्नीवर धरायचं. स्पिरीट मुळे बोटाने पेट घेतल्यास ती शुद्ध आहे, अन्यथा त्यात पाणी टाकून भेसळ केली आहे. रात्री थंडीपासून सरंक्षण म्हणून इथे एक एक शॉट राक्षी प्यावी. उग्र वास असून, स्पिरीटचा वास येतो. शॉट रिचवताच नाकातून fumes निघाल्यासारखं वाटतं. दोन दिवस नेपाळी घरघुती जेवणाचा आस्वाद घेतला. इथे पर्यटक म्हणून एक वेगळी वागणूक मिळाली नाही. मानसिंगच्या घरा पासून जवळच एक बढिया स्पॉट शोधून काढला होता. इथे बसून काही दिवसांपूर्वी घेतलेली बासरी वाजवत अंधारात गायब व्हायचं. डासांनी फोडून काढे पर्यंत बसून राहावे. दोनच दिवस राहिलो, मात्र इथून पाय हलत न्हवते. मानसिंगने पृथ्वी चौकात बस पार्क जवळ सोडलं, तो पाऊस सुरु झाला.

आता काठमांडू बघायचा बेत होता. रस्ता पुन्हा एकदा तृशिली नदीच्या कडेने जाणार होता. आज तरी काही करून तृशिली किनारी थांबवलं पाहिजे ह्याने. नशीबाने तृशिली किनारी बसचं टायर पंक्चर झालं. थोडा वेळ तृशिलीचा तो रुद्रावतार बघत एक रोलीचा आस्वाद घ्यावा, अन् मग धुक्यात कुठेतरी निघून जावं, विरघळून जावं. त्या नदी किनारी असलेल्या त्या स्वच्छ वाळूत एखादा कण बनून लुप्त व्हावं. ह्या रेतीच्या कणा मध्ये कुठेच साम्य नाही. कुठलेही दोन कण एक सारखे नाही दिसणार. तरी आपल्यासाठी सगळे कण एक सारखेच. Equality ही एक relative value आहे. Equality मध्येपण दोन वेग वेगळे levels असू शकतात. ह्याच equalities च्या फंद्यात अडकलेल्या असंख्य माणसांचा समुह धर्माला जन्म देत असावा. धर्म नावाचा पेहराव चढवून आपण एक सारखे व्हायचा प्रयत्न करतो खरा, पण त्यात कितपत यश पदरी पडेल हे सर्वांनाच माहिती आहे. काही वर्षांपूर्वी अनुराग कश्यप चा चित्रपट  - "गुलाल" आला होता, आता त्यातल्या पृथ्वी बना आणि दुके बनाचं संभाषण आठवलं.
पंक्चर मात्र काढून झालं होतं.

आज वेळेत काठमांडू मध्ये पोहचलो. मानसिंगने दिलेल्या पत्यावर जाऊन, राहायची चौकशी केली. ठीक ठाक भाव करून रूम मध्ये सामान टाकलं. 

शलौम शाब - ५

16 December 2011 वेळ: Friday, December 16, 2011
अन्नपूर्णा बेस कॅम्प, आखून दिलेल्या दिवसांपेक्षा कमी दिवसात संपवला. नाहीतर, माझा खिसा संपला असता. जसं उंचावर जाऊ, तसं राहण्याचा खर्च आणि खाण्याचा खरचं वेगाने वाढू लागले. पार्ले-जी आणि सूप पावडर मुळे, बराच खरचं वाचला. ट्रेकसाठी अनेक पर्यटकांची गर्दी. त्यामुळे लॉज वर हमखास जागा मिळेल की नाही हे कधीच ठाऊक नसायचं. अश्यावेळी sleeping bag ने साथ द्यावी. हिमालय बघायला माझ्यासारखे पर्यटक येतात. पण इथल्या लोकांना हिमालय काय नवीन नाही. पैसा बनवणं जास्ती महत्वाचं. साधारण ह्या प्रकारचे अनुभव टाळण्यासाठी जास्तीत जास्त अंतर एका दिवसात कापायचं, आणि रात्री एखाद्या कुंपणात पडी टाकायची. बऱ्याचदा माझ्यासारख्या एखाद दुसऱ्या पर्याताकाशी भेट व्हायची. मग सूप पावडरची देवाण घेवाण करत फोटोज बघत गप्पा व्हायच्या. पहाटे जितक्या लवकर निघाल, तितकी कमी गर्दी रूट वर लागेल.

लांद्रूक मध्ये मात्र अगदी वेगळा अनुभव आला. अत्यंत प्रेमळ लोक, जीव लावणारे. ज्या माणसाच्या (कालो) घरात राहत होतो, त्याने अगदी सकाळचं जेवण खिलवून मगच सोडलं. अतिशय प्रेमळ जोडी होती ती. इतके दिवस नेपाळ मध्ये झालेत, इथल्या काही पद्धती फार आवडल्या. पैसे देतांना/घेतांना नेहमी दोन्ही हाताने घेतल्या/दिल्या जातात. वाटण्याची वृत्ती सर्वांमध्ये आहे कुटून भरलेली आहे. कालो आणि त्याचे कुटुंबीय मला वर्षानुवर्ष ओळखत असल्यासारखे गप्पा मारतांना बघून मजा वाटली. ह्यांना आपल्या देशात बोलवावं आणि मग प्लास्टिकचा आनंद व्यक्त करावा? निम्म्याहून जास्त सगळं अनुकरण, चांगलं असण्याचं.

आपण तर नेहमी एका बाजूने विचार करणारे बनलोय. आज मी ठरवलंय विज्ञानच्या विरुद्ध विचार करायचा. विज्ञानाचा उदो उदो करत असतांना आपण आपल्याच पायावर उद्योगीकरण नावाचा धोंडा नाही का मारून घेतला? कधी कधी आपण गरज आणि personal privileges मध्ये  इतका घोळ घालून का बसतो, की त्या मुळे आपण कशाला प्राधान्यता देतोये हे विसरून बसतो. सगळा गुंता ह्यात वाढत जातो. चला एक उदाहरण देतो - फेसबूक. आम्हीह्या सगळ्या सोई आल्यामुळे आता वेग वेगळ्या ठिकाणी बसलेल्या मित्रांशी गप्पा तर मारू शकतो. अर्थात चांगलं आहे हे आणि म्हणून आम्ही घरातल्या एकाच कोपऱ्यातून दुनिया बघतो. लक्षात ठेवणं - हा एक माणसाचा नष्ट होणारा गुण धर्म आहे. दर ३ महिन्यांनी मी फेसबूकवर माझा वाढदिवस साजरा केला, अन् ह्या वर्षी मला २८ लोकांनी ३ वेळा 'विष' केलं. कमाल असते की नाही.

आमच्यात एक जिद्द खूप दांडगी आहे. समोर येईल त्या वस्तूला काबूत आणायचं. पक्ष्यांपेक्षा वेगाने उडायचे आहे, चीत्त्यापेक्षा वेगाने अंतर कापायचं आहे, अन् थकवा पण नको. जंगलच्या जंगल सपाट केली. कारखाने उभे केले. खोऱ्याने पैसा ओढला, चैनीत जगले आणि एक दिवस जंगलात फिरायला गेले तर त्यांना हरीण, हत्ती, गेंडा, वाघ, बिबट्याच्या मागे एक छोट्या नळीतून धूर निघतांना दिसला तर? सगळे वन्य प्राणी आता लवकरच संपुष्टात येतील. मग आपण डिझलवर चालणारे प्राणी बनवू. नुसत्या माणसांनी भरलेल्या मातीच्या गोळ्यावर काय रहायचं? मग आजूबाजूला बघण्यासारख्या काही प्राणी नको का?

माझं म्हणणं आहे एखादी अशी शाळा असली पाहिजे, जिथे सगळे यंत्र मानव जातील. तरी तिथल्या मास्तरीण बाई त्यांच्यात पण खोट काढतील. सगळं काही perfect करायच्या नादात जो काय राडा केला आहे, तो कसा साफ करणार? सगळं काही जर एका इक्वेशन मध्ये मांडून मोकळे झालो तर काय होईल? पुन्हा एक अचाट तंद्री लागली होती. विज्ञान विरोधी विचार करता करता बराच वेळ निघून गेला होता. सूर्य मागे डोंगराआड झाला होता. आजकाल मी फोटो काढण्यापेक्षा त्या ठिकाणी बसून तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेत बसतो आहे.

संध्याकाळ पासून हवा काही ठीक न्हवती. ढग दाटून आले होते. Juan - Denmark मध्ये हवामान खात्यात काम करण्याच्या अनुभवावरून सांगितलं, पुढचे ५-७ दिवस ढगाळ वातावरण असेल. पावसाची पण शक्यता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य दर्शन झालंच नाही. अधून मधून पाऊस ही होताच. इथे इंटरनेट सारख्या सोई प्रचंड महाग होत्या. काही ठिकाणी २०० रु. तीस मिनिटं ब्राउज करायचे होते. एक लिटर पाण्याची बाटली ४०० पर्यंत जाते. पण इथे हिमालयातून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी असतांना पाण्याची बाटली विकत घेऊन पिण्याला वर चित्रगुप्ताने पण माफ केलं नसतं. आता ह्या खराब हवामानात उगाच रिस्क नको म्हणून मग अन्नपूर्णा ट्रेल संपवलं पाहिजे.

अन्नपूर्णा बेस कॅम्पचा संपूर्ण ट्रेक एक अप्रतीम अनुभव होता. मला तर अन्नपूर्णापेक्षा माछापुच्रे जास्ती आवडला. माछापुच्रेच्या निमुळत्या शीलाकडे बघत लगेच तंद्री लागायची! काही हाडाचे भटके ही भेटले. गरम पाण्याचं एक कुंड ही लागलं. त्यात शिजवलेला भात एका साधूने मला खायला दिला. त्याला नर्मदा नदी बघायची खूप इच्छा होती. एका साधुशी गप्पा मारायचा एक वेगळाच अनुभव असतो. त्याच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतात, आणि समोरच्याकडे ऐकायला वेळ पाहिजे बस!

हा ट्रेक संपवून पुढे काही दिवस मंसिग गुरुंगच्या गावी जाईन म्हणतो.






 

शलौम शाब - ४

06 December 2011 वेळ: Tuesday, December 06, 2011
थे बसचे हॉर्न इतके कर्कश का आहेत? पार झोपेचं खोबरं केलं साल्यांनी. एक बढिया बंपर रोली तयार केला. शांत वाटू लागलं.
सामान पाठीवर टाकल अन् पुन्हा एकदा पृथ्वी चौकात आलो. कालच्या काळोखात ह्या जागेला उगाच नावं ठेवली होती. कालच्या त्या दोन पोरांच्या लोचटपणावरून सगळं Judge केल्यामुळे मी प्रचंड कडवाहट बाळगून बाहेर पडलो खरा, पण चौकात येऊन नजारा बघून मनातली कडवाहट एकदम साफ झाली. कुठल्या दिशेने जायचं आहे माहिती नसून, मी चालू लागलो - हिमालय जो दिसला होता. आता पोखरा लेक पाशी जायचं होतं. चौकशी करून मायक्रो पकडली. लेक कडे जाता-जाता काही नियम आखायला घेतले.

१) Taxiवाल्या समोर कुठलाच पत्ता विचारू नये, आणि त्यांना भाव ही देऊ नये.
२) पटकन कुठलीही गोष्ट judge करायची नाही.

वाटेत मोकळ्या मैदानात चार उंच बांबू उभे करून, त्यावर एक पाळणा बांधलेला दिसला. शेजारच्या म्हातारीला विचारलं तर समजलं, की नवरात्रीत लहान मुलांसाठी असे पाळणे उभे केले जातात.

इतक्यात पोखरा लेक आला पण! एक नकाशा घेणं जरुरी होतं. इकडे रस्त्याच्या कडेला Souviner विकायला ठेवले होते. दुकानाच्या बाहेर बसलेल्या कोणाशीही नजर मिळवली ना मिळवली की समोरची व्यक्ती आपल्या प्लास्टिकच्या चेहऱ्यावर खोटं स्मित आणून "नमस्ते" करते. "Buy something?" मग आपण पण खोटं-खोटं हसून त्याला नाही म्हणायचं आणि पुढे जायचं. शेवटी ही सगळी पापी पेटसाठी चाललेली उठाठेव. एक गॉगल पाहिजे. Eye contact करायचाचं नाही.

चालत-भरकटत एका पुस्तकाच्या दुकानासमोर आलो. त्याच्याच दारात bag ठेवली. एक नकाशा निवडला. काही वापरलेले जुने पुस्तकं स्वस्तात विकायला होती. घ्यायची इच्छा फार होती. २ पोस्टकार्ड घेतले आमच्या गोडू-बाबासाठी. एकावर पत्ता, आणि निरोप टाकून तिथल्याच पत्र पेटीत टाकले. दुकानदार हसमुख होता. त्याने पोस्टकार्ड बघितलं, "बस इतना ही लिखा?" "भांजी सिर्फ ४ महिने की हैं|" तो पण हसला. लगे हात मी त्याला तिकडे राहण्यासाठी स्वस्त जागा कुठे मिळेल विचारून घेतलं. त्याने लगेच एक फोन लावला. म्हणे त्याचा एक मित्र आहे, ज्याचं घर तिथून १७ किलोमीटर वर आहे, त्याच्याशी माझी भेट घालून दिली. ह्या मित्राचं नाव मानसिंग गुरुंग. नेमकं मानसिंगचं घर आणि मला पुढे जायचं ठिकाण विरुद्ध दिशेला होते. मानसिंग स्वतःहोऊन मला dam side घेऊन गेला. तिकडे फर्स्ट क्लास राहायची सोय करून दिली. खास म्हणजे माझ्या बजेट मध्ये ही रूम बसत होती! रूम मधून अन्नपूर्णाचा नजरा, समोर गच्चीत टेबल खुर्च्या लावल्या होत्या. वाह! बहोत खूब!

मानसिंग व्यवसायाने शेतकरी आहे. Tourist येतात तेंव्हा, तो त्यांना पोखराच्या आजू-बाजूचा परिसर फिरवून आणतो. गप्पा मरता मरता त्याला पण एक रोली ऑफर केला. तो असाच इकडून तिकडून इंग्रजी बोलायला शिकला होता. मग सहज खडा टाकून बघितला, "जर मी तुझ्या गावात येऊन मुलांना इंग्रजी शिकवलं तर चालेल का?" तर तो खुष होऊन, "हो" म्हणाला. मग तर मला शेती करायची पण हौस आली. चलो, आज नसीब अजमा के देखते! (मला तरी कुठे माहित होतं, आज नशिबात काय काय वाढून ठेवलं असेल) मी ऑफर दिली की त्याच्या शेतावर येऊन काम करून, मुलांना इंग्रजी शिकवीन आणि मोबदल्यात तू मला तुझ्या घरी राहू दे. मानसिंगला मान्य होतं. मग हळूच म्हणाला, "मी पण गरीब माणूस आहे, थोडे पैसे तर मिळालेच पाहिजे नं?" ही आमची डील जमली. अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक आटोपून मग मी त्याच्या गावी येईन म्हणून सांगितलं. जाता-जाता मानसिंगने मला ACAP च्या ऑफिस समोर सोडलं. इथून जवळपासच्या ट्रेकचे परमीट मिळतात.

अन्नपूर्णा बेस कॅम्प साठी परमीट मिळवून सारंगकोटचा बेत आखला. मायक्रो पकडून, सारंगकोटच्या पायथ्याशी आलो. २ टेकड्या पार करून जायचं होतं. ४५ मिनिटांचा ट्रेल असावा. अंधार पडायच्या आत वर पोहचलं पाहिजे. वर जातांनाच ही फेरी वसूल झाली. वर पोहचलो, अन् तंद्री लावायला काही वेळ नाही लागला. अचाट हिमालय आणि त्याची ती तांबूस कॉलर. उगवणारा चंद्र. दुसरीकडे पाहतांना एका मागे एक डोंगर फिक्के पडत चालले होते. जणू Plan of action असल्या सारखे ते डोंगर रचले होते. जवळचे टार्गेट अगदी नीट दिसत होते. लांबचे टार्गेट दिसत होते, पण पुसटशे. (नंतर एकदा ऑनलाईन आल्यावर पंकज झरेकरचं > हरवले हे रान धुक्यात < बघून पुन्हा हाच विचार आला.)
वरती एका बाकड्यावर खूप जास्ती वेळ बसून राहिल्यामुळे, खाली येतांना अंधार पडला होता. पुन्हा एकदा pack up झालेला बस पार्क. Dam Side कडे जाण्यासाठी आता एक तर taxi करा, किंवा लिफ्ट मागा. एकाने मला लिफ्ट दिली. मी मुंबईचा असल्याचे कळतच तो आणखीन खुष झाला. मी महाराष्ट्रीय असल्याचा प्रश्न त्याने केला. ही पुन्हा होकार दिला. ह्या पुढे झालं, त्यामुळे मी चालत्या गाडीवरून पडायचा बाकी होतो. तो माणूस चक्क मराठीत बोलू लागला! दुर्गा गेली १० वर्ष मुंबईत काम करत होता. त्याचं मूळ गाव पोखरा असून, त्याला आता सिंगापूरला नौकरी मिळाली होती. दहा वर्षांपासून तो खार मध्ये राहत होता. अशी ओळख निघाल्यावर तर त्याने सरळ मला घरी जेवायचं आमंत्रण दिलं. Dam Side पासून घर जवळच होतं. आधी त्याच्या घरी गेलो. (घरच्यांना आमची मैत्री जुनी वाटावी म्हणून मराठीत गप्पा मारत होतो.) प्रशस्त बंगला होता. जेवण गरम करून होई पर्यंत मला त्याचा laptop दिला, वाय-फाय चालू करून दिलं, काढलेल्या फोटोजचा back-up घेतला. त्याच्या परिवारच्या सगळ्या सदस्यांशी मग गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता दुर्गाचं माझ्या Cafe Leopold लिहलेल्या टी-शर्ट कडे लक्ष गेलं. मग तर आणखीन जिगरी वाढली! दुर्गाचं career इथून चालू झालं होतं. तितक्यात जेवण समोर आलं. इथे जास्ती मसाले नाही वापरत, पण ज्या दोन मासाल्यांवर भाजी / डाळ बनवतात त्याची चव भारी असते. इथे भात खाल्ल्या जातो. पोट भर जेवल्यावर आता सगळ्यांचा निरोप घेतला. दुर्गाचं म्हणणं होतं, आता पोखराची night life बघू.

शून्य planning आणि एकटे फिरण्याचा हा फायदा. मनात येईल ते करता येतं. आधी पोखरा तलावाच्या भोवतालच्या एका शांत ठिकाणी बसलो. इथून पोखराची रात्रीची रोषणाई दिसत होती. गप्पांच्या ओघात सिरीयस टोनवर कधी आलो ते कळालच नाही. मग तिथून निघालो, एका घरगुती बार मध्ये गेलो. इथे २ टेबल होते. ओटा - वजा counter होतं. एक मुलगी सगळं सांभाळत होती. आम्ही बीयर मागवली. बाजूला बसलेला शेरपा पण आमच्या गप्पांमध्ये शामिल झाला. आता हलकी तार बसली असतांना दुर्गाने मला रात्रीच्या वेळी हिमालय बघण्यासाठी विशेष स्पॉट दाखवला. उंडारून यायला बराच उशीर झाला होता. जर्मन बेकरीच्या समोरच्या गल्लीत लुम्बिनी resort लगेच गावलं. दुसऱ्या दिवशी पोखरा पासून २६ किलोमीटर वर असलेल्या दुर्गाच्या गावी फिरवून आणायचा बेत आखला. उद्या दुपारी नया पूलला जाऊन अन्नपूर्णा बेस कॅम्प चा ट्रेक सुरु करायचा बेत मी फायनल केला.

आजचा दिवस कुठे उडाला समजलं पण नाही. तुम्हाला कदाचीत वाटत असेल, असं कोणी अनोळखी माणसाबरोबर जातं का? मला लुटला असता तर? माझ्या मनात पण एक वेळ हा विचार आला होता. पण मला लिफ्ट देतांना दुर्गाने पण माझ्यावर विश्वास टाकला होताच की. अन् आता तर माझ्याकडे गमावण्यासारख काहीच न्हवते. आपोआप सगळे मनातले अडथळे गळून पडले.









शलौम शाब - ३

02 December 2011 वेळ: Friday, December 02, 2011
गोरखपूर स्टेशन बाहेरून सोनौलीसाठी बस मिळतात. दोन तासांचा तर प्रवास आहे.
रस्ता तसा ठीक ठाक होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर दूर पर्यंत सपाट जमीन होती. काझीरंगाला जातांना पण असेच रस्त्याच्या कडेला दूर दूर पर्यंत मोहरीचे शेत होते, बस आता त्याच रस्त्याची आठवण आली. कधीतरी ह्या सगळ्या रस्त्यांवरून स्वतः होऊन ड्राईव्ह करत जायचं आहे.

साउथ आफ्रिकेच्या Dalmaine ची कंपनी होती. गोरखपूर साठी निघतांना वाराणसी स्टेशनवर आमची ओळख झाली. Dalmaine त्याच्या मित्रांना भेटायला काठमांडूला जात होता. मला, आधी पोखरा पहायचं होतं. सोनौली वरून, चालत बॉर्डर ओलांडता येते.बॉर्डर ओलांडायच्या आधी, तुमच्यकडे असेल नसेल त्या गोष्टींचे declaration करायला विसरू नका. असं नको व्हायला, की परत येतांना तुमच्या ४ वर्ष जुन्या कॅमेर्यासाठी तुम्हाला कस्टमवाले उगाच चिरीमिरी मागतील. कस्टम ऑफिसरने जुन्या कॅमेऱ्याला declarationची गरज नाही सांगितलं, तरी declare करा.

तुम्ही जर स्टेट बँकचे खातेदार असाल, तर करंसी एक्स्चेंजची काळजी नसावी. बॉर्डर क्रॉस केल्यावर जवळच एक नेपाळ एस.बी.आय चं ATM आहे. इकडे बिना कमीशन तुम्हाला नेपाळी रुपये मिळतील. खात्यातली रक्कम आता नेपाळी रुपयाय्त दिसत असल्या मुळे, तुमच्या खाते आता १.६० पट जास्ती दिसेल. नेपाळ मध्ये येताच आयुष्यात किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात बघा.

सोनौली वरून भैरवा बस पार्क तसं फार लांब नाही, पण सवारी गाड्या १० नेपाळी रुपयात चालतात. भैरवा बस पार्क होऊन पोखरा जाण्यासाठी बस मिळतात. सोनौली, भैरवा मध्ये भारतीय रुपये पण घेतल्या जातात. अजून नेपाळी रुपयांची सवय झाली न्हवती,  अजून नोट देतांना एकदा ती नीट बघून देत होतो. पोखरा इथून ५ ते ६ तासांच्या अंतरावर आहे. पोखरा येई पर्यंत अंधार पडला असेल. राहण्यासाठी काही सोय बघावी तर लागेलच. ह्या इलाक्यात साडे चार - पाच वाजता अंधार पडतो, अन् ७-८ वाजता बऱ्यापैकी रस्ते रिकामे असतात. जो होगा सो देखा जायेगा, म्हणून खिडकी बाहेरचा नजाराचा आस्वाद घेणं पसंद केलं.

 भरतपूरच्या पुढे गेल्यावर रस्ता तृशिली नदीच्या कडेने जातो. स्वच्छ वाहणाऱ्या ह्या glacial water ची काय स्तुती सांगावी....जिथे पाण्याचा प्रवाह संथ होत, तिथे पोहणारे मासे पण दिसतात. कुठे अचानक रुद्र अवतार घेऊन खळ-खळत वाहणारी, कुठे अगदी शांत. जसा घाट सुरु झाला, हवेतली थंडी वाढू लागली. एकतर वाराणसी मध्ये नुकतीच बघितलेली (गटार) गंगा, आणि आता ही इतकी स्वच्छ नदी. बघतच राहावं. घाटातल्या वळणावर ४-५ घरं असलेलं गाव. त्याच्यातच उपहार गृह. सळीवर मसाला लावून तळलेले, नदीतले मासे लावलेले असत. बेसन लावून अख्ख्या उकडलेल्या अंड्याचे पकोडे मिळत होते. बाकी सर्व आपल्याकडे दिसणाऱ्या गोष्टी. कुरकुरे, लेज, पार्ले, फ्रुटी... वेगळ्या देशात आल्यासारखं वाटतच न्हवत. इकडे फक्त भाषा वेगळी आहे, नाहीतर परकेपण जाणवलं नसतं. जर रस्त्यात एखाद दुसरं मोठं गाव आलं, की तिकडून नदी ओलांडायला एक केबलचा पूल असायचा. झुलता पूलच म्हणा की.

इथे नदी मध्ये राफ्टिंग, कयाकिंग - कनोइंग करण्यासाठी बरेच धाडसी येत असतात. मी इथवर ऐकलं आहे की, राफ्टिंग, कयाकिंग मधून मिळणाऱ्या नफ्यातून ह्या टूर कंपन्यांना राहण्याच्या किंमतीत वाढीव सवलती देणं परवडते. थोड्याच वेळात, एकी कडे नदी आणि हिमालय ह्यांना एकाच फ्रेम मध्ये बसवण्याची खटपट डोळ्यांनी सुरु केली. अंधार पडल्यावर हिमालय चमकदार दिसत होता.

बस ड्रायव्हर जसं उशीर होतोय वाटलं, की गाडी सुसाट पळवत होता. बसला एक स्पेशल हॉर्न होता. ओवरटेक करायला जागा पुरात नसली की हा हॉर्न वाजवून समोरच्याची गाडी कंट्रोल करायची. पोखरा मध्ये पोहचे पर्यंत रात्रीचे आठ वाजले. ह्या बस पार्क मध्ये तर कधीचाच pack up झाला होता. इथून Dam Side जाण्यासाठी Taxi वाले १००० च्या खाली घेत न्हवते. बस सेवा तर ७ च्या पुढे बंद होते. अन् आता इतके तास बस मधून खिळखिळा झाल्यावर, मला ताणून झोपायचं होतं. मी एखादी स्वस्त सुंदर टिकाऊ जागा शोधायच्या कामाला लागलो. हॉटेल मध्ये पाठीवर मोठाली बाग बघितली की किती पण फडतूस हॉटेल असलं तरी भाव औकातीच्या बाहेरचे सांगतात. कपडे, मोजे आणि रुमाल धून वाळत टाकायला एक हवेशीर रूम हवी होती. मला हॉटेलची चांगल्यात चांगली डील मिळवून द्यायला दोन जळवा माझ्या मानगुटीवर येऊन बसल्या. त्यांनी दाखवलेले हॉटेल बघून माझं डोकं भण-भणु लागलं होतं. त्याने चांगली जागा म्हणून जेंव्हा मला एका कुंटणखाना दाखवला, त्यातल्या एकाची कॉलर धरून समज देऊन हुसकावून लावलं.

नकळत  मी केरळचा अनुभव आणि इथे येणाऱ्या अनुभवत तोल-मोल करत होतो. कदाचीत म्हणूनच मला  सगळेच गंडवताय्त असं वाटत असावं. एकदाच्या ह्या जळवा दूर हाकलल्यावर, इतक्या उशिरा कुठल्या हॉस्टेल मध्ये जागा मिळते का बघत होतो. हॉस्टेल मध्ये हॉटेल पेक्षा कमी किमतीत काम होतं. बऱ्याचदा कॉमन बाथरूम्स असतात. पण नेमकं सिंगल रूम कुठेच उपलब्ध न्हवती. शेवटी, त्यातल्या त्यात स्वस्त पण २ बेडची रूम मिळाली. तरी मी तिकडे रात्री पुरता राहणार म्हणून घासाघीशी केली. येतानाच्या रस्त्याचं वर्णन करण्याचा मूड पार उतरून गेला होता. थंडगार पाण्याने कपडे धून वाळत टाकले. आता जेवायला काय मिळेल म्हणून खाली गेलो. तर किचन बंद झाल्याची माहिती मिळाली. आता जवळ असलेल्या बिस्किटांवर रात्र ढकलावी लागेल.

अजून नेपाळ मध्ये २४ तास पण झाले नसतील, पण पहिला धडा शिकलो होतो. जोवर आपल्या खिश्यात पैसा असतो तो पर्यंत आपण cautious होऊन फिरतो.

शलौम शाब - २

01 December 2011 वेळ: Thursday, December 01, 2011
डोक्यावर उन तापत असतांना, एखादा म्युझियम बघत वेळ कसा जातो कळत नाही.

वाराणसीमध्ये संध्याकाळी गंगा आरती बघण्यासारखी असते. तो पर्यंत, गल्ल्या-बोळ फिरत-बघत एक चक्कर मारून झाली. परत येऊन पाहतो, तर घाट अगदी स्वच्छ होते. क्लोरीन टाकून सफाई झाली होती. जशी आरती सुरु झाली, घाटावर धूप आणि अगरबत्तीचा सुवास पसरला! अचानक माहोल तयार झाला. खूप गर्दी जमली होती. फ्लोरिडाच्या इथन आणि मी, आम्हाला नीट फोटो मिळतील अशी जागा पकडून ठेवली. थोडं टीमवर्क करून आम्ही आमच्या पुरता प्रकाशचित्र घेत होतो. मग खाली बसलेल्या बाबूला राग आला, त्याने आमच्या टीमवर्कला foul घोषीत केलं. मला तर त्याचं म्हणणं कळलंच नाही, पण आता इकडे हुज्जत कोण घालणार? पण त्याच्या कॅमेऱ्याला जोडलेलं ४००mm बघून माझी थोडी जळाली.

आरती संपली, आणि इथन आणि त्याची मैत्रीण परत भेटले. आता, त्यांना परत हॉटेल पर्यंत जाण्यासाठी रिक्षा हवी होती. गोरा बघून तर रिक्षावाल्यांना ताव येतो, ४० रुपयेचे २०० मागतात. माझ्यासाठी पण असे वरचढ भाव कुठे तरी असतील, ह्याचा अनुभव लवकरच आला. अतिथि देवो भवच्या जाहिरातीत अमीर खान तेवढा हिरो वाटतो, इकडे दोन पोरं जाता जाता मला, "looking gorgeous" म्हणून टोमणा मारून गेले. मी पण उत्तर म्हणून २-४ भ-कार हासडले, मग मात्र "sorry" ची पांढरी फीत झळकली.

तुम्हाला घाटावर साधू खूप दिसतील, सगळे ढोंगी वाटले मला. एका साधूचा फोटो काढायला थांबलो, तर आधी त्याने पैसे मागितले. पैसे देत नाही तो पर्यंत आपलं रुपडं लपवून ठेवलं. मी पण टांग दिली. हा तर मला पण एक कल्चरल शॉक होता. बाहेर देशचे हे बघून तर हादरून जात असतील. गाईला देव मानणारे, रस्त्यात बसलेल्या गाईच्या पाठीत काठी हाणून उठवून लावतांना बघितलं की काय होईल. सर्व माया मागे सोडलेले साधू, पैसे घेऊन करत काय असतील?

असो, अश्या गोष्टी खटकत राहतीलच. काळजीपूर्वक ह्यांना आपल्या पासून लांब ठेवणं आपलीच जबाबदारी.

वाराणसी मध्ये खाण्यासाठी अनेक उपहारगृहांचे पर्याय तुमच्यासाठी मोकळे असतील, तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठे आस्वाद घ्यायचा ते ठरवा. केशर, मधली स्पेशल थाळी वर ढेकर देत मधुर जलपान मध्ये तोंड गोड केल्याशिवाय आत्मा थंड होत नाही. आमची खळगी भरली, की मग डोक्याला चावी बसते.
बऱ्याचदा शब्दांचे मनोरे न बांधता, कुठे मनातल्या मनात एखादा विचार गिरवत बसण्यात जी मजा आहे, ती कश्यात नाही. मग गिरवता गिरवता कधी track बदलतो, कळत पण नाही. वेग कधी वाढतो, कळत पण नाही. आजवर कधी पोटभर तंद्री लावलीच न्हवती. नेमका फोन वाजायचा, तर कधी गजर. मी अश्या जागेच्या शोधात होतो, जिकडे वाक्य-शब्द-अक्षर पोहचत नाही. आपण आपल्यापुरता कधी शब्दांना अर्थ देतो, आणि कधी त्यांचा अर्थ काढून घेतो, कधी-कधी तर दोन अर्थ देतो. आता तुम्हीच सांगा, अश्या मेह्फिलीत बसून पोकळ मनोरे उभारणार? उदाहरण: निसर्गाने आपल्याला सगळं दिलं. चांगलं आणि वाईटच्या व्याख्या आपणच आखल्या आहेत. आजू बाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमुळे आपण एका programed मशीन बनून bias तयार करतो. आपल्याकरता तुकतुकीत नाक आणि गोरं असणं हे सौंदर्य, मग आफ्रिकेत मोठे ओठ आणि पसरट नाक सौंदर्य मानल्या जातं. एक वेळ आपण माणसांनी बनवलेल्या गोष्टींमध्ये चांगलं आणि वाईट ओळखणं सोपं आहे, पण निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टींची पारख करण्यायोग्य आपण आहोत का?

तेवढ्यासाठी आता दीड हजार किलोमीटर लांब आलो आहे, म्हणालात तरी चालेल. कधीतरी एकट्याने असा प्रवास करण्यात वेगळाच अनुभव मिळतो. आपल्याच तांड्यात वावरल्याने सतत आपल्या ओळखीच्या, पटणाऱ्या, आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर राहतो. आपल्याच भवताली सगळं बना-बनाया माहोल घेऊन फिरलो, तर तिथे अस्तित्वात असलेला माहोल कसा अनुभवता येईल? एका बंद खोलीत डांबून ठेवल्यासारखं होतं मग. उन्हाळ्यात गच्चीत झोपण्याची मजा आठवून तर बघा, आहे का त्याला किंग बेडची सर?

भारत रेल्वेशी romance करत प्रवासात, कधी एकसारखा अनुभव येणार नाही. काही खास संभाषणं पण होत नाहीत, पण एक निश्चित की आजू-बाजूच्या लोकांचं निरीक्षण करण्यात आणि कंटाळ आला की चिंतन-मनन करत कापलेले ३६-४८ तास पण कमी वाटतात. तो एक विशिष्ठ रेल्वे गाडी मधला वास, नकळत आवडायला लागेल. सकाळी नाश्त्यात मिळणारे cutlets चा एक विशेष nostalgia आहेच, सोबतीला कचोरी,सामोसे येत असले तर काय सांगावं. सकाळी पाच वाजता "गरम चाई" चा गजर असतांना, तुमची आणखीन १० मिनिट झोपायची इच्छा पण उडवून लावेल. स्टीलच्या भांड्याला तोटी बसवलेली, अन् खाली वाडग्यात फुलवलेले कोळसे. कडाक्याच्या थंडीमध्ये गरम चहा देता यावा म्हणून ही सिस्टम अन्य कुठे दिसणार नाही. पहाटे चहाचा कप घेऊन गाडीच्या दारात उभं राहून, धुक्याच्या दुलईत लपलेले शेत झप-झप मागे जात असतांना तो pantry मधला फिक्का चहा पण चांगला लागतो. अशी ही जादू आहे रेल्वेची.



शलौम शाब - १

30 November 2011 वेळ: Wednesday, November 30, 2011
जाग आल्यावर, मी मुंबईत असल्याची जाणीव व्हायला थोडा वेळ घेतला. आज रविवार, अजून निम्मं शहर रविवारची झोप साजरी करत होतं. गेल्या काही दिवसांच्या सवयीने झोपेचं घड्याळ पार बदलून टाकलं आहे. गजर न लावताच ४:०० - ४:३० वाजता जाग येते. एक मोठा मग भरून honey-ginger ग्रीन टी घेऊन बसलो. mp3 player त्याचं काम चोख बजावतोय. मला मात्र काही न करता असंच खुर्चीत बसून वेळ काढत, घेतलेल्या अनुभवांचा आस्वाद घ्यायचा आहे.

परवाच तर निघालो होतो. कोची वरून निघालेली ही ट्रेन बिहारला जाणार होती. हिंदी न येणाऱ्या मल्याळी / तामिळ बंधू हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत असतांना, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थच निघावा. अश्या माहोल मध्ये बरोबर घेतलेलं पुस्तक खाक वाचता येईल, म्हणून वरच्या बर्थ वरून मजा बघत बसलो. पहिला मुक्काम वाराणसी होता.

ह्या जागेला वाराणसी नाव इथल्या दोन नद्यांमुळे पडलं, वरुणा आणि असि. ह्याच नद्या पुढे गंगेला जाऊन मिळतात. वाराणसी बद्दल असं पण ऐकलं होतं की भगवान शंकरने तांडव केल्या नंतर प्रलय आला, पुन्हा मग पृथ्वीचा पुन्हा विकास वाराणसी पासून झाला. अश्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पण ऐकायला मिळतील. स्टेशनच्या बाहेर येताच मागे लागलेले रिक्षावाले, सायकल रिक्षावाले, बसवाले, हॉटेल दाखवणारे कपभर चहापण सुखाने पिऊ नाही देणार. (अनघाताई हसू नका)

आज बनारस फिरायचं होतं. इकडे देऊळ, घाट आणि देऊळ व्यतिरिक्त बनारसी साड्या मिळतात - हे पहिल्या दर्शनी बनवलेलं चित्र. गजबजाट असलेल्या रस्त्यांवर ट्राफिक सिग्नलचा एक खास शोभेची वस्तू म्हणून वापर केला होता. पोलीस हवालदार ऑटो-रिक्षा वाल्याकडून चिरीमिरी घेण्याला प्राधान्य देत होता. ह्या रिक्षांमध्ये समोर ३ (चालक सोडून) आणि मागे ३ ह्या हिशोबाने सवारी घेतात. दुप्पट प्रवाश्यांना बसवल्यावर का नाही पोलीस त्या रिक्षेवाल्याला अडवणार? मग मलाच जाणीव झाली, साला आपण अजून भारतातच आहोत. स्टेशन बाहेरून Godowlia साठी सवारी रिक्षा मिळतात. १२ रुपयात तुम्हाला Godowlia चौकात सोडतील. इथून १० मिनिट चालत गेलात की राजेंद्र घाट.

बारीक सडकेला अगदी लागून थाटलेली दुकानं, सायकल रिक्षांच्या घंट्या (हो एका सायकल रिक्षेला किमान ३ घंट्या असतात!) इथे सायकल-रिक्षा टेक्नो आहेत, ब्रेक खाली २ घंट्या जास्ती बसवल्या असतात ब्रेक दाबला की लगेच घंटी वाजू लागते! ऑटो-रिक्षाचे पीर-पीर वाजणारे हॉर्न, आणि ह्यांच्या पार्श्वभूमीवर आरती आणि मंदिरातल्या घंट्या वाजत असतात.

रस्त्याच्या कडेने चालत असतांना कितीही कडेने चाललात, तरी एखाद्या सायकल-रिक्षाचा धक्का लागलाच पाहिजे. त्या शिवाय तुम्हाला वाराणसी मधून बाहेर पडता येत नाही. आता तुम्ही वाराणसी मध्ये आलाच आहात तर काही गोष्टी करून पाहणं गरजेचं आहे. उदाहरण: बनारसी पान खाणे, पुरी-जलेबी चा नाश्ता, कचोरी आणि लस्सी, मातीच्या भांड्यात चहा पिणे आणि शुगर किक बसे पर्यंत रबडी हाणायची. ह्यात भर टाकायची म्हणून सायकल-रिक्षाचा धक्का तितकाच महत्वाचा आहे.

भटकत भटकत गंगा किनारी असलेले सगळे घाट फिरून झाले. काशी विश्वेश्वर पण बघून झालं. देवळात जाणे तसं पण मला जड जातं, म्हणून मग बाहेरून फिरून सगळं पाहून घेतलं. स्कंद पुराण मध्ये काशी खंड मध्ये ह्या शहराची महिमा रचली आहे. इतिहासातल्या अनेक घडा-मोडी ह्या जागेने अनुभवले आहेत. एस.एल भैरप्पांच्या "आवरण" आणि "सार्थ" वाचल्यानंतर, आज वाराणसीचा अनुभव घेत फिरत होतो. सगळीकडे फिरून झाल्यावर एका ठिकाणी घाटावर निवांत बसून, आजू-बाजूच्या चहल-पहल बघत बसावं. बोटीतून फिरवून आणणारे, मालिशवाले येऊन तंद्री मोडतात. सगळ्यांना नाही म्हणत म्हणत धोबी घाटा जवळ येऊन बसलो होतो, तिकडे विनोद पाटीलशी ओळख झाली. त्याचं वाराणसी मधलं काम आटोपून तो घाट फिरायला आला होता.

जेवतांना त्याने सहज गंमत सांगितली, ज्या हॉटेल मध्ये त्याची राहण्याची सोय केली होती, तिथे त्याला भयाण अनुभव आला. आदल्या रात्री त्याला जाग आली तेंव्हा, लाईट चालू होता. दोन-तीन वेळा त्याने उठून लाईट बंद केला. शेवटी, काय गडबड आहे म्हणून खाली जाऊन रखवालदाराला विचारलं. रखवालदाराने सांगितलं की त्या खोलीत ३-४ महिन्यांपूर्वी एका बाईने पंख्यावर गळफास लावून घेतला होता. तेंव्हा पासून तिथे असे काही किस्से होत असतात. सकाळ पर्यंत पाटील साहेब मग receptionवर बसून राहिले. आता हे सांगण्यामागे कारण तसं खास नाही. ही गोष्ट ऐकून मी विसरून पण गेलो, पण एखादी गोष्ट तुमच्या sub-conscious mind मध्ये कशी जाऊन बसते ते पुढे सांगीन.







नान-सेन्स - १

22 November 2011 वेळ: Tuesday, November 22, 2011


(When things ain't just नान-सेन्स... they are Absolute नान-सेन्स :D)

(नान-सेन्सिबली) Yours,
Saurabh

दिवाळी...

04 November 2011 वेळ: Friday, November 04, 2011
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... Happy Diwali... Happy Diwali...

गुंड्याः अय, बंड्या... काय रे?! कोणत्या दुनियेत राहतोस??

बंड्याः का रे??

गुंड्याः दिवाळी संपली आणि आता शुभेच्छा देतोय्स?!!

बंड्याः अरे हा.. जाऊदे रे. कालच माचाफुकोने दिवाळीचे फोटो एडिट करुन दिले. म्हणुन म्हटलं चला टाकूया ब्लॉगवर. तसंपण बरेच दिवस ब्लॉग सन्नाट्यात होता.

गुंड्याः सन्नाट्यात होता!!!??? आणि आता तु काहीतरी पोस्टुन त्याला सन्नाट्यातुन बाहेर काढतोय्स.

बंड्याः हाऽऽऽ :-)

गुंड्याः बरय. चालू दे.. माझ्यातर्फेपण सगळ्यांना Happy वाली D-वाली.

याऽऽऽय... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...




आपला,
(शुभेच्छुक) सौरभ


गोल्ड स्पॉट

14 October 2011 वेळ: Friday, October 14, 2011


गेल्या २-३ वर्षांपासून, शुक्रवार म्हंटलं की प्लेलिस्ट वर गोल्ड स्पॉटचं - फ्रायडे वाजवल्या शिवाय दिवस सुरूच होत नाही. वीकएंडची चाहूल लागली असतांना, हे गाणं एकदम मूड बनवून जातं. मग दिवस कसा एकदम मस्त जातो.



आजची संध्याकाळ तर एकदम विशेष!
विजांचा गड-गाडाट, दाटून आलेले ढग आणि हलका पाऊस.
घर बसल्या माहोल तयार! पटकन एक चांगला फोटो पण मिळाला.
अश्यात, मस्त एक कप कॉफी घेऊन > गोल्ड स्पॉटचं - फ्रायडे वाजू द्या.



एक प्याला - अनेक प्यायले!

11 October 2011 वेळ: Tuesday, October 11, 2011

आज पर्यंत ब्लॉग विश्वात वाईन कशी प्यावी, चांगली व्हिस्की कशी ओळखावी बद्दल बरंच वाचलं.
दारू आणि मद्य मध्ये बराच फरक आहे, तितकाच जितका लफडं आणि affair मध्ये आहे. तसा, दारू ह्या शब्दाचा 'बेवडा' शी संबंध जोडल्या जातो. दारू कुठली असो, ती चांगली की वाईट ते पिणाऱ्यावर अवलंबून असतं. (सांगायचं झाल्यास नोकिया ११०० आणि आय-फोन ४ मध्ये काही फरक नाही. दोघांवर फोन आला की कळतं, मेसेजची देवाण-घेवाण करता येते. बस इतर accessories हव्या असतील तर जास्ती किंमत मोजून आय-फोन घ्या!)

आज आपन देशी दारवां बद्दल लिहणार! जी दारू, जिभेच्या प्रत्येक भागावर एक सारखीच लागते अन् पोटात उतरतांना गरम वाटते! चांगल्या दर्ज्याची दारू कुठे उपलब्ध होते, हे बऱ्याचदा माहिती नसल्याने आपण ती चाखून बघायला धजत नाही. कुठली ही दारू बनवण्यासाठी आंबवणे महत्वाचं असतं. नेमकी ही आंबवण्याची पद्धत चुकार असल्याने, बऱ्याच जणांची अशी दारू प्यायची हींमत होत नाही.

तुम्ही पिऊन बघाच, हे ही म्हणणं नाही माझं.

देशी दारू, मध्ये जी.एम - संत्रा, बडीशेप, मोसंबी < त्यातल्या त्यात sophisticated असतात. ताडी, खोपडी, हात भट्टी, काजू फेणी, मोहाची, तांदळाची, बाभळी ह्यातले काही प्रकार.
सुरवात mild दारू पासून करू.

ताडी:
नीरा आंब्ल्यावर ताडी बनते. चवीला आंबूस, दुधाळ रंग. गुत्यात नेहमी जुन्या बीयरच्या बाटलीत मिळते. १०-१२ रुपयाला एक बाटली. ताडीच्या गुत्यात एक विशिष्ठ आंबूस वास तुमचं स्वागत करतो. जमीन नेहमी ओली असते. मित्रांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या नावाने, प्रत्येक बाटलीतले २ घोट जमिनीवर ओतल्या जाते. गुत्यात, शौकीन ओळखणं कठीण नसतं, तो माणूस ताडी मधली पावडर काढण्यासाठी ताडी रुमालाने गळून घेतांना दिसतो. आपल्याकडे एक समज आहे, दारू जर चढली नाही तर ती बेकार. म्हणून ताडी मध्ये एक्स्ट्रा किक बसण्यासाठी पावडर टाकल्या जाते. शक्यतो पावडर वाली ताडी पिऊ नये. ताडी ही हळुवार चढणारी चीज आहे. ताडी, ही किडनीसाठी उत्तम असल्याचा समज ताडी प्रेमी मध्ये आढळतो. किडनीवर प्रेम करून लिव्हरशी वैर पाळणारे म्हणजे ताडी पंटर म्हणून ओळखावा. अत्यंत शांत नशा होते. पलंगावर पाठ टेकवल्या टेकवल्या झोप लागते, आणि hangover तर अजिबात नाही. तोंडी लावायला - उकडलेली अंडी, तांदळाचे पापड, उकडलेलं कडधान्य, मिरची पकोडे घेतल्या जातात. तोंडी लावायचे पदार्थ नेहमीपेक्षा जास्ती तिखट आणि खारट असतात. ताडीच्या आंबूस गोड चवीचा उतारा म्हणून हे तोंडी लावणं. शहरापासून थोडं बाहेर जाऊन, चौकशी केल्यास पावडर नसलेली ताडी तुम्हाला मिळेल. ठोक घ्यायची झाली, तर ८०-१०० रुपये बदली (५ लिटर) मिळते.
पुण्याच्या जवळपास चांगली ताडी नक्की मिळेल.

ताडीची कोकणातली बहिण : माडी.


हात भट्टी:
गूळ आणि खराब धान्य कुजव्ल्या जातं. त्यातून distillation मार्गे दारू जमा केली जाते. ठीक ठिकाणी concentrate स्वरूपात पोहचवल्या जातं. त्यात पाणी मिसळून सौम्य केल्या जातं. उग्र स्पिरीटचा वास येतो. तांब्या - हे माप आहे. हात भट्टीची खासियत अशी आहे, की कधी ही २ तांब्या पिऊन चढेल, तर कधी ५ तांब्या रिचवल्यावर चढेल. हात भट्टीची नशा मात्र एकदम रावडी असते. नवख्याला भिर्मीटायला लावते. मजबूत hangover बसतो, अंगालाही प्रचंड वास येतो. तोंडी लावायला अननस, बोर, करवंद मीठ लावून रुचकर लागतात. हात भट्टी आणि ताडी कधी एकत्र पिऊ नये. फार जहाल मिश्रण होतं. समोर पेल्यात हात भट्टी असतांना, जग/दुनिया/आयुष्य/प्रेम  हे विषय शक्यतो टाळा. राग आणि हात भट्टीचं जुळलं तर उद्या तुमच्या नावावर किमान एखादी "फुल" ची केस असेल!

हात भट्टीची सावत्र बहिण म्हणजे खोपडी. चवीला हात भट्टी पेक्षा फिक्की, पण हिचं माप किटली आहे. ह्या दोघी बहिणी तुम्हाला बगैर त्रास चाखायची असेल, तर 'कोरी' (concentrate) कुठे मिळते ह्याचा पत्ता लावा. शक्य नसल्यास एखाद्या हात भट्टीवाल्याला गोडीत घ्या. मग घरी आणून, त्यात पाणी मिसळून सौम्य करून घ्या! ह्या दोघी बहिणी स्टीलच्या ग्लास मधून पितांना समजत नाही. त्यातल्या त्यात, चाहाच्या प्याली पेक्षा थोड्या मोठ्या प्यालीत पिण्याची मजा येते. पिण्याचा एक नियम आहे, प्रत्येक ग्लास उचलला की रिता करूनच खाली ठेवायचा (chug). ह्यांची चव तितकी रुचकर नसल्याने, ती घोटात संपवणे सर्वांना पटेल.

बाभळी:
एखादी काचेची बाटली (स्वच्छ धून पुसून) मध्ये साखर भरल्या जाते. बाभळीच्या झाडा खाली खणून, बाटलीत जाऊ शकेल असं मूळ - सोलून, पुसून साखर भरलेल्या बाटलीत टाकतात. मग वरून प्लास्टिकने गच्च बांधून, वरून कापडाने बांधतात. आता महिनाभर ती बाटली तशीच सोडायची. महिन्याभराने, बाभळीच्या मुळाचे रस आणि साखर मिसळून आंबलेले असतात आणि दारू सारखं द्रव्य तयार झालेलं मिळेल. खूप उग्र वास नसतो, पण, बराच वेळ -'पिऊन बघू की नको' मध्ये जातो. भरपूर साखर असल्याने गोडसर चव लागते. पण एक ग्लास मध्ये विमान झालेलं असतं. हिचा अतिरेक करायचा नसतो. बाभळीची दारू, बाजारात मिळत नाही. ती एक तर स्वतः बनवून प्या, नहीतर ह्यातला एखादा तज्ञ शोधा.

फेणी:
गोव्याला गेलं की फेणी पिऊन बघाच. काजू फेणी कधी ग्लास मध्ये ओतून घेण्यात मजा नाही. सरळ बाटलीतून कोरी फेणीचे घुटके घेण्यात जास्ती मजा आहे. काजू फेणीची चव बऱ्याच लोकांना आवडत नाही. काजू फेणीची चव आवडत नसेल, तर कोकम सरबत मध्ये जीरा पावडर टाकून बघा. जिन मध्ये फेणीचा स्मॉल, जरा चव आणतो! फेणी बरोबर मासे हे सर्वात चांगलं तोंडी लावणं आहे. फेणी प्यायल्यावर किमान २४ तास तरी फेणीचा वास तुमचा साथ सोडणार नाही. काजू फेणी बनवण्याची प्रक्रिया बघण्यासारखी असते. १०X१० फुटाच्या टाक्यात नासके काजू फळ टाकल्या जातात. एक माणूस त्या फळांना कुस्करून, लगदा बनवून मग आंबवतो. Distillation करून ती बाजारात विकल्या जाते. फेणी बरोबर, चुलीत भाजलेले काजू खाण्याची मजाच वेगळी आहे.

जांभळाची दारू पण काजू फेणी सारखीच बनवल्या जाते. चवीला मात्र थोडी तुरट असते. पहिल्या धारेची प्यायल्या मुळे मी पहिल्या round मधेच भिर्मीटलो. जास्ती काही आठवत नाही!

मोहाची:
मोहाची फुलं खायला गोड लागतात. उन्हाळ्यात माकडं ही फुलं खायला अगदी gentleman बनतात. मूठभर मोहाची फुलं माकडांना दाखवलीत, तर ते माकड तुमच्या पायात येऊन बसेल, आणि एक एक फुल वेचून खाईल. मोहाची फुलं चढत नाहीत. त्यांची दारू चढते. विदर्भ मधल्या काही आदिवासी गावात उत्तम मोहाची दारू  प्यायला मिळेल. १५-२० रुपयात एक बिसलेरीची बाटली भरून मिळते. ही एक बाटली दोघा-तिघांना पुरून नशा देते. उग्र स्पिरीटचा वास, लिम्का किंवा मिरिंडा बरोबर रुचकर लागेल. आम्ही मात्र गावकरी पितात तशी प्यायची ठरवली. तोंडी लावायला बीडी (अनुप बीडी, बंगाली बीडी). Hangover बसतो. मोहाची दारू गढूळ असल्यास, घेऊ नये.

तांदळाची:
भारतातल्या तांदूळ प्रधान प्रदेशातले आदिवासी, तांदळाची दारू बनवतात. तांदळाची बियर म्हणून प्रसिद्ध आहे. सडीचा तांदूळ (unpolished) ३-४ तास शिजवून, त्यात काही पाला टाकून, त्याचे गोळे बनवतात. हे गोळे एका मडक्यात ठेवतात. काही दिवसांनी आंबवलेले हे भाताचे गोळे आणि त्याचं सुटलेलं पाणी गळून घेतल्या जातं. बियर सारखं थंड करून प्यायलात, तर हिच्या प्रेमात पडल!

फळांची दारू:
ही घरगुती दारू आहे. मडक्याला खालून एक बारीक छिद्र करून, त्यात नासकी मोसंबी, केळी, पपई, संत्री, पेरू कुस्करून टाकतात. त्यात ४-५ मूठ गूळ/साखर. जमिनीत खड्डा खणून, त्यात आधी एक वाटी ठेवतात. त्यावरती हे मडक. वरून कापडाने झाकून, मडक्याची मान वर ठेऊन बाकी भाग मातीने झाकून टाकतात. १५-२० दिवसात तुम्ही घरगुती दारू तयार! खाली वाटीत जमलेलं द्रव्य मजबूत नशा देतं. Distillation करून घेतल्यास जास्ती चांगलं. कडवट चव, आणि नासका वास असतो. ही दारू शॉट मध्ये घ्यावी. ३० मी.ली. च्या प्रमाणात, एका झटक्यात पोटात. तिसऱ्या शॉट मध्ये माणूस भिर्मीटला पाहिजे!

आता तुम्ही म्हणाल हे सगळं वाचून तुम्हाला काय मिळणार?
तेच जे मला हे लिहून मिळालं, काही नाही. नेमकं ह्या दारू मध्ये कोणी अभिरुची निर्माण केली न्हवती. हात भट्टी पिणं सुसंस्कृत सवय नाही अशी समज आहे. म्हणून बरे-की-वाईट मध्ये आपणच आपले जुळवून घेतो.
नेहमीच काय तेच ती cabernet sauvignon च्या मार्गी जायचं? आज मी पण झिंगलो, आनंदाने झुलत निघालोय!

तुम्हाला अजून देशी दारूंची माहिती असल्यास झरूर कळवा! मला चाखून बघायला नक्कीच आवडेल!



आपला भिर्मीटलेला,
माचाफुको. 

राम लीला - शिवाजी पार्क (दुसरी फेरी)

06 October 2011 वेळ: Thursday, October 06, 2011
परवा रावणाचा मेक-अप बघायला नाही मिळाला, म्हणून आज परत राम लीलाच्या ग्रीन रूम मध्ये घुसलो.
आपल्याला तर राम लीला बघण्यापेक्षा मागे ग्रीन रूम मध्ये सगळ्यांची तयारी बघायला जास्ती मजा आली ब्वा!

मथुराला येण्याचं आमंत्रण पण मिळालंय रावण कडून :D




अपेक्षा आणि निप्पत्ती

03 October 2011 वेळ: Monday, October 03, 2011

दोन-तीन दिवसांपुर्वी राजीव काकांनी बझ्झवर एक गोष्ट पोस्ट केली होती. ज्यात एक कमाल भारी कुत्रा, खरेदी करून बस मध्ये बसून आपल्या घरी जातो. ह्या कुत्र्याचा पाठलाग करत दुकानदार, त्याच्या घरी पोहचतो. तिकडे पाहतो, तर कुत्र्याचा मालक त्याच्या कुत्र्याला बडवत असतो. कारण विचारल्यावर मालक म्हणतो, "ह्या आठवड्यात हा तिसऱ्यांदा घराची चावी घेऊन जायला विसरला आहे." गोष्ट संपते, आणि मग moral of the story, salary axiom आणि law of employment.

तुम्ही ही ओळ वाचताय म्हणजे, तुम्ही त्या कुत्र्याच्या गोष्टीशी सहमत आहात.
आपण कधी कुत्र्याची जागा घेतो, तर कधी त्या मालकाची. परिस्थिती कुठली ही असो, disappoint आपण होत असतो.

आपल्या अपेक्षा आणि निप्पत्ती कधीही सहमतीने राहू शकत नाही.



Fig.001
Fig.002
आठवी-नववी मध्ये गणितात "SETS" नावाचा धडा होता. ह्या सेट्सच्या मदतीने अपेक्षा आणि निप्पत्तीची तुलना करून पाहू.

आपल्या अपेक्षा (Expectations) - E, निप्पत्ती (Results) - R, आणि U = युनिवर्सल सेट.

आपल्या अपेक्षा आणि निप्पत्ती जितके जास्ती जुळतात, त्याच्या सम प्रमाणात आपल्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. हिरव्या रंगाने, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जोडला आहे.
आपण आपल्या भाबड्या मनात, नेहमी आकृती ००२ रंगवून फिरत असतो. निप्पित्ती पेक्षा नेहमी आपल्या अपेक्षा कमी ठेवल्याचा भास देत असतो.

 शाळेतले दिवस आठवतात. पेपर कितीही चांगला गेला असेल, तरी सगळ्यांना सांगतांना, "ठीक गेला" असं सांगतांना स्वतःची तयारी करत असतो.
 "सोप्पा गेला" असं म्हंटलं असता; ९०/१०० मिळाले तरी, मनात कुठेतरी काटा टोचत राहतो. सोप्पा पेपर असूनसुद्धा १० गुण कमी पडले. अश्या परिस्थितीत कोणी १० गुणांचा हिशोब मागितला की खच्चीकरण होतं.

काही दिवसांनी जाणीव  झाली, आपण यंत्र नसून, माणूस आहोत. आकृती ००२ ची परिस्थिती यंत्र-मानवासाठी  आहे. तरी यंत्र मानवला काय माहिती आनंद म्हणजे काय असतो.
Fig.003


आपण नेहमी आकृती ००३ घेऊन झटत असतो.
निप्पत्ती आणि अपेक्षा थोड्याफार जुळतात. मन खट्टू होण्यामागचं कारण विशेष म्हणजे नेमकं तुमची ती "विशेष" अपेक्षा हिरव्या क्षेत्रात नसते. तसेच, तुमचे Efforts (E) ही निप्पत्तीशी फार थोड्या प्रमाणात जुळत असतात.

आपली अपेक्षा नेहमी आकृती ००४ ची असती, ज्यात तुमच्या अपेक्षा, निप्पत्ती आणि तुम्ही त्यात टाकलेले efforts हे सगळे सारखेच असते, तर राजा मिडास पण रोज तुमच्या घरी येऊन तुमचे पाय धुऊन जाईल.

Fig. 004
नशिबाला दोष देणारे आकृती ००३ शी निगडीत असतात. संपूर्ण मानव जात आकृती ००३ वरच असते.

पण खरंच ह्यात नशिबाला दोष देण्यासारखं काही नाहीये. आपली परिस्थिती जर आकृती ००१/००२/००४ सारखी झाली तर आपल्या गती मधली सुसंगतता बिघडेल.
Fig. 005
अश्या परिस्थितीत अपेक्षा, निप्पत्ती आणि एफर्ट्स ह्यांच्यात समान तोल आपल्यासाठी त्यातल्या त्यात उत्तम ठरेल (म्हणजेच आकृती ००३).

आता आकृती ००३ ही आपल्यासाठी सर्वात योग्य आहे, ह्या निष्कर्षावर आपण पोहचलो आहोत.
आता नेमकी तुमची "विशेष" अपेक्षा हिरव्या क्षेत्रात नसली तर तुमची निराशा होणार हे निश्चित आहे. ह्यावर इलाज म्हणून एकतर आपल्याला अपेक्षेच्या  सेटचे क्षेत्रफळ कमी करून, E1, E2, E3, E4 मध्ये वर्गीकरण करता येत (आकृती ००५). ह्यालाच आपण इंग्रजी मध्ये "setting multiple goals" म्हणतो. आता E1, E2, E3 आणि E4 मध्ये प्राधान्याने एक एक करून आपले E क्षेत्र Y मध्ये बदलू शकतो. ह्याला आपण rectification म्हणू.

Rectification करतांना काही मोजके सेट्स असल्यास ठीक आहे. कमी वेळात जास्ती सेट्स असल्यास नतीजा उलटू शकतो. उपाय म्हणून आपल्या क्षमते इतके सेट्स करणे.मात्र तुमच्या "विशेष" अपेक्षे चा एक विशेष सेट करायला विसरू नका. आता नक्किच तुमची "विशेष" अपेक्षा हिरव्या रंगत आली असणार आहे, अन् तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद फिरून परत आला आहे!



पात्रांनी मच्छी - R&D

02 October 2011 वेळ: Sunday, October 02, 2011
 पात्रांनी मच्छी खाण्यासाठी एकतर तुमचा कोणी खास पारसी मित्र असला पाहिजे, नाहीतर तुम्हाला चांगली पात्रांनी मच्छी कुठे मिळेल हे तरी माहिती असलं पाहिजे. परवा (३० जुलै) राजीव काका, अनघा ताई आणि सौरभ  बरोबर पात्रांनी मच्छी खाल्ली. सध्या घरचं किचन माझ्या हातात असल्याने, पात्रांनी मच्छीवर प्रयोग सुरु झाले.

प्रत्येक्षात, पात्रांनी मच्छीसाठी पापलेट वापरला जातो. पापलेटला काप देऊन, लिंबू मीठ लावून मुरत ठेवतात.

ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, धणे, जिरे आणि थोड्या मिरच्या टाकून चटणी बनवल्या जाते.

मास्याला ही चटणी नीट लावून, केळीच्या पानात बांधून वाफेवर शिजवतात.
वरून चमचाभर तूप सोडून, लिंबाच्या फोडी बरोबर पेश करतात.

वाफेवर शिजवण्यासाठी तुमच्याकडे स्टीम कुकर नसल्यास,
एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून, मग त्या मध्ये स्टीलची चाळणी फसवून, वरून झाकण लावलं तरी फर्स्ट क्लास स्टीम कुक होतं.



Experiment 1:
बोंबील:
बोंबील, केळीचं पान, हळदीची पानं, आणि बाकी सगळं नेहमीच्या पद्धती सारखं.
बोंबील लिंबू-मीठ लावून मुरत ठेवले. खोबरं,कोथिंबीर, धणे, जिरे, २ मिरच्या टाकून चटणी बनवली.
चटणी बोंबील ला व्यवस्थित लावून, एक बोंबील केळीच्या पानात बांधला, दुसरा हळदीच्या. २० मिनिटं वाफेवर शिजवल्यावर, वरून चमचाभर तूप आणि ४-५ थेंब लिंबाचा रस.

निष्कर्ष:
१. केळीच्या पानातल्या पात्रांनी मच्छी पेक्षा, हळदीच्या पानातल्या माछीला जास्ती चांगली चव होती. हलकी हळदीच्या पानाची चव होती.
२. घरात पात्रांनी मच्छी बनवणे, अवघड काम नाही.
३. बोंबील नाजूक असल्याने, बोम्बिलचे तुकडे पडण्याची शक्यता असते.

Experiment 2:
रावस:
रावसच्या नेहमी पेक्षा जाड तुकडे कापून घेतले. खोबऱ्याच्या चटणी मध्ये कोथिंबीरचं प्रमाण कमी करून, पुधीना टाकला. हळदीच्या पानात वाफेवर शिजवले.

निष्कर्ष:
१.रावसची पात्रांनी > +१
२. पुधीनाची चव आणि nascent हळदीच्या पानाची चव चांगली ब्लेंड होते.

Experiment 3:
बांगडा:
बांगड्याला दोन्ही बाजूने काप देऊन, मुरत ठेवलं. तुपाच्या ऐवजी ऑलीव्ह ओईल वापरलं.

निष्कर्ष:
१. बांगडा प्रेमी ह्याला कधी वाईट नाही म्हणणार. तुम्हाला काटे काढायचा कंटाळा असेल, तर तुम्ही सुरमई/रावस मध्ये पत्रानीचा आस्वाद घेऊ शकाल.
२. पात्रांनी मध्ये ऑलीव्ह ओईलची चव नापसंत.
३. बांगडा जितका जास्ती मोठा मिळेल, तितका चांगला.

टिपणी: लिंबू-मीठ मध्ये भरपूर वेळ मुरलेला बांगडा, हळदीच्या पानात लपेटून घ्यावा. एका घमेल्यात कोळसा फुलवून त्यावर शिजवा. सोबत लसणाच्या पातीची चटणी घ्या. मात्र जोडीला थंडी आणि भरपूर वेळ असणं गरजेचं.

Experiment 4:
रावस V1.0:
बाजारात असलेल्या सगळ्यात मोठ्या रावस च्या पोटाचे तुकडे घेऊन या.
नेहमी सारखं लिंबू मीठ लावून मुरत ठेवा.
आज Microwave oven ला सहभागी करून घेतलं.

कृती १:
नेहमी सारखं वाफेवर शिजत ठेवायच्या आधी, चटणी आणि चीज स्प्रेड लावलं.
वाफेवर १५-२० मिनिटं शिजत ठेवलं.

चीजची एक विशेष चव आली.
रावस पात्रांनी विथ चीज > +१

कृती २:
मुरू दिलेला रावस मायक्रोवेव ओवन मध्ये ९०० डिग्री सेल्सियस वर ४ मिनिटं  शिजवला.
मग २-२ मिनिटं हाय ग्रील केलं.
आणि खोबरं-पुधीना-धणे-जिरे-मिरची-आलं-लसूण च्या चटणी बरोबर पेश केलं.
सोबतीला लिंबाची फोड!

निष्कर्ष:
१. मायक्रोवेव मध्ये नेहमीपेक्षा अर्ध्या वेळात पात्रांनी मच्छी तयार होते.
२. चीजची चव ज्याला आवडत नाही, त्याला सलग दोन दिवस मुळा खायला घालणे. तिसऱ्या दिवशी चीजचे गुणगान गातांना  दिसेल!



पात्रांनी मच्छी < ही पद्धत त्यातल्या त्यात कमी कॅलरी वाली आहे.
आता लवकर बनवा, आणि आम्हाला जेवायला बोलवा!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates